– अविनाश दुधे
स्वतःचे मूळ शोधण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. आपलं मूळ कुठलं, आपले पूर्वज कोण होते, आज आपण जिथे आहोत तिथे कसे आलो, असे अनेक प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतात. नामवंत लेखक रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या जवळपास ८०० पेक्षा जास्त पानाच्या महाकादंबरीत मूळ शोधण्याच्या ध्यासातून कादंबरीचा नायक सातशे वर्षे जुना इतिहास, वंश, जाती, धर्म आणि मानवी संबंधांचे धागेदोरे उलगडतो. प्रत्येकाने वाचावी अशी ती कादंबरी आहे.
मात्र आपले मूळ, पूर्वज शोधायचे कुठे? सुदैवाने भारतीय लोक परंपरेत ‘भाट’ नावाची व्यवस्था आहे. ही मंडळी प्रत्येक कुटुंबाची वंशावळ वर्षानुवर्ष नोंदवून ठेवत आले आहे. पूर्वी हा भाट चार -पाच वर्षाआड यवतमाळच्या माझ्या घरी यायचा. कुटुंबाची सात पिढ्यांची माहिती सांगायचा. मूळ गाव, पुढे कुठे कुठे स्थलांतरित झाले. कुटुंबाचे कुलदैवत आदी सगळी माहिती सविस्तर द्यायचा. कुटुंबात लग्न झालं असेल तर नवीन सून वा जावयाची माहिती, बाळ जन्माला आलं असेल तर त्याची नोंद, कोणाचा मृत्यू झाला असेल तर ती माहिती तो मोडी लिपीत त्याच्या भाट वहीत नोंदवून घ्यायचा.
तेव्हा त्याचं महत्त्व वाटलं नव्हतं. अनेक वर्षांपूर्वी यवतमाळही सुटलं. तेव्हा त्याने सांगितलेली कुठलीही माहिती, नोंद लिहून ठेवली नव्हती. पण अलीकडे काय कोण जाणे आपला, कुटुंबाचा इतिहास माहिती करून घेण्याची उत्सुकता जागृत झाली. आणि तो भाट आठवला. खूप वर्ष उलटले होते.
पण शोध घेतला तर काय सापडत नाही? भाटाचा शोध सुरु केला. भाट पूर्वी ज्या गावात राहत होता तिथे अनेक मित्र व पत्रकारांना कामी लावले. अनेक दिवसपर्यंत तो नाही सापडला. मात्र एक दिवस बहिणीचा फोन आला. तिच्या जाऊबाईंना तो भाट माहित होता. पूर्वी यवतमाळच्या घरी यायचा त्या भाटाचे निधन झाले मात्र त्याचा पोरगा ती परंपरा सांभाळतो. तो वरुड तालुक्यात पोरगव्हाण येथे राहतो, अशी माहिती मिळाली.
पुढचे काम सोपे होते. त्याला फोनाफोनी झाली. आणि अलीकडे प्रवीण नवले हे भाट आपल्या पोथ्या, बाड घेऊन अवतरले. त्यांनी त्यांच्या टिपिकल शैलीत संपूर्ण परिवाराची वंशावळ सांगितली. पणजोबाच्या पलीकडे आपल्याला फार माहिती नसते. मात्र यांच्याकडून सात पिढ्यांची माहिती मिळाल्याने आनंद झाला. मूळ कोकणातील असल्याची रंजक माहिती मिळाली. (म्हणून कोकणाचे आकर्षण असेल का? ) कोकण टू मराठवाडा आणि नंतर विदर्भ प्रवास कसा झाला, देवदैवत आदी माहितीही मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईच्या हस्ताक्षरातील नोंद सापडली. एवढ्या वर्षानंतर तिचे अक्षर पाहून डोळे नकळत पाणावले. जुनी पत्रं वा कागदपत्रे काही सेकंदात तेव्हाचा काळ डोळ्यासमोर उभा करतात. मागे जी चूक केली ती यावेळी केली नाही. संपूर्ण माहिती व्यवस्थित नोंद करून घेतली. ती type करून Save केली. पोराला सांगितले, पुढे तू हे update करशील.
भाट परंपरा किती वर्ष टिकेल माहिती नाही. त्यांची नवीन पिढी गावोगावी जाऊन लोकांना वंशावळ सांगणे, नवीन माहिती नोंदवून घेणे यासाठी फार उत्सुक नाही. जुन्या संपूर्ण पोथ्या मोडीत आहे. सध्याची पिढी मोडी भाषा शिकण्यासही उत्सुक नाही. भाटाजवळची पोथी /बाडही जीर्ण अवस्थेत आहे. सर्व समाजातील भाट आणि त्यांच्याजवळच्या पोथ्या, बाडांची ही अशीच व्यवस्था आहे.
खरं तर भाट परंपरा आणि त्यांच्या जवळच्या पोथ्या हा अतिशय समृद्ध वारसा आहे. त्या -त्या समाजातील दानशूर लोकांनी हा वारसा आधुनिक स्वरूपात कसा जतन केला जाईल, सुरक्षित राहिलं याकडे लक्ष द्यायला हवं.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
